राज्यात पीक विमा भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे
राज्य सरकारने विमा कंपन्यांना हप्ता देण्याचा जीआर काढून ५ दिवस झाले. पण शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा का झाली नाही? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. खरेतर सरकारने जीआर काढला पण बॅकांना त्यानंतर १ एप्रिलपर्यंत सलग ४ दिवस सुट्ट्या होत्या. त्यामुळे काही हप्ता विमा कंपन्यांना मिळाला तर काही हप्ता रखडला होता. पण विमा कंपन्यांना दोन दिवसात सर्व रक्कम मिळेल, असे कृषी विभागाने सांगितले.
सरकारने जीआर काढल्यामुळे काही विमा कंपन्यांना प्रत्यक्ष हप्ता मिळाला नसला तरी काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा करण्याचे काम सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वाशीम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा केली जात आहे. उरलेल्या जिल्ह्यांमध्येही दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल आणि आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा झालेली असेल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. विमा कंपन्यांनीही याला दुजोरा दिला आहे. खरिप २०२४ हंगामात पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई या ४ ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे. शेतकऱ्यांना एकूण २ हजार ३०८ कोटी रुपये भरपाई मिळणार आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ७०६ कोटी रुपये तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून १ लाख ४८ लाख शेतकऱ्यांना १४१ कोटी भरपाई मिळणार आहे. तसेच खरिप हंगाम २०२३ मधील १८१ कोटी, रब्बी हंगाम २०२३-२४ मधील ६३ कोटी तसेच खरिप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ मधील २.८७ कोटी रुपयांची भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे.