महापालिका क्षेत्रात एखाद्या वॉर्डातील दारूचे दुकान बंद करायचे असेल तर तेथील एकूण मतदारांच्या ५० टक्के मतदान बाजूने व्हायलाच हवे, ही अट रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्कमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
आता ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले तरी ते ग्राह्य धरले जाईल. झालेल्या एकूण मतदानाच्या ७५ टक्के मतदान हे दारू दुकानाच्या विरोधात असेल तर ते दुकान तत्काळ बंद केले जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बीअर आणि दारू दुकानांना परवानगी दिली जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याबद्दल भाजपचे महेश लांडगे आणि राहुल कुल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. महापालिका वॉर्डात एकूण मतदारांच्या ५० टक्के मतदारांची अट बदलून ती झालेल्या मतदानाच्या ५० टक्के करण्यात यावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती.
सोसायट्यांची एनओसी अनिवार्य :
राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या 1281 व्यावसायिक गाळ्यात बीअर किंवा दारूचे दुकान सुरू करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक राहील, असेही अजित पवार यांनी जाहीर केले.